संत तुकाराम आणि इस्लाम

आज संत तुकाराम महाराज बीज दिन. आजच्या दिवशी त्यांचे सदेह वैकुंठ जाणे की हत्या या वादात मला पडायचे नाही. परंतु इतके मात्र खरे की आजच्या दिवशी त्यांच्या आयुष्याची शेवट झाली. परंतु दुर्दैव हे की त्यांच्या आयुष्याची शेवट अनेक ठिकाणी उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. सर्वधर्म बाबतीत हेच चिरंतन सत्य आहे. बहोतकरून उत्सव, सण हे जेत्यांची पराजितांवर केलेल्या अन्याय आणि अत्याचाराचे प्रतीकोत्सव असतात किंवा एकाद्या विचाराच्या लादण्यासाठी असतात. ‘कॉन्सिल ऑफ नेसिया’ने पाचव्या शतकात धर्माचे नामकरण ख्रिश्चन असे केले. येशूंनी देवत्व बहाल केले आणि येशूच्या वास्तविक अनुयायांना चिरडून टाकले. पुढे हाच चिरडोत्सव ख्रिस्ती संस्कृतीचा अविभाग्य भाग झाला आणि धार्मिक उत्सव म्हणून उदयास आला. प्रेषित मुहम्मद यांच्या जन्मतारखेबाबत दुमत आहे परंतु त्यांचा मृत्यू एका झंझावाताच्या, वादळाच्या, एक वैचारिक आंदोलनाच्या, एक नवचेतनेच्या जन्मदात्याचा मृत्यू. जगाने त्याची नोंद ठेवली. त्यांच्या मृत्यूच्या तारखेबाबत कोणाचेच दुमत नाही. परंतु दुर्दैव म्हणजे याच दिवशी ‘मिलादून नबी’ सारखा उत्सव जन्मोत्सव म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतीय समाजातदेखील साजरे केले जाणारे बहुतेक सन आणि उत्सव याच प्रकारात मोडतात. म्हणून कोणाला कितीही झोम्बल तरी मी सणवारीच्या शुभेच्छा देत नाही. जेत्यांनी पराजितांवर लादलेल्या अन्याय आणि अत्याचाराचा तो उत्सव असतो.

असाच काही प्रकार जागतिक दिनांचा असतो. सांस्कृतिक दहशतवाद जगातील सर्वात घातक दहशतवाद आहे. या दहशतवादाचा जन्मदाता युरोप. जगावर आपली संस्कृती लादून त्यांना आपले वैचारिक गुलाम बनविण्यासाठी (कारण त्यांनी महासत्ता राहणे म्हणजेच इतरांनी त्यांचे अंकित राहणे) आंतरराष्ट्रीय दिनांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा जगभर प्रसार करू लागले. आमच्या संस्कृतीला मान्य करा, आम्ही दाखवतो ती पूर्व दिशा आहे हे मान्य करा तरच तुम्ही ‘पुरोगामी’ सारखी मते त्यांनी जगावर लादली. भारतातून चाटुगाम्यांची मोठी कुमक युरोपला मिळाली. चीन, कोरिया, जपान, रशिया, जर्मनी, फ्रांस, व्हिएतनामसारख्या जगातील असंख्य प्रगत राष्ट्रांनी आपली राष्ट्रीय अस्मिता खंबीरपणे मांडली असताना भारतातील चाटुगामी पश्चिमी सांस्कृतिक दहशतवादापुढे लोटांगण घालू लागले. असो. हा सणवार, उत्सवांचा संक्षिप्त आढावा.

इस्लामचे भारतातील योगदान:
कदाचित हा विषय मुळात आश्चर्यकारक वाटलं असेल अनेकांना. इस्लाम भलेही अरब भूमीतून आलेला संदेश असेल परंतु भारतातील ९७% मुस्लिम हे धर्मांतरित मुस्लिम आहेत. याच मातीचे सुपुत्र आहेत. याच मातीत जन्मतात आणि याच मातीची पुरले जातात. त्यांना पुरण्यासाठी कोठे परदेशी नेले जात नाही. मागील ८०० वर्षांपासून भारतात राहतात. यांच्या कित्येक पिढ्या जन्मल्या आणि संपल्या. कसे शक्य आहे की यांनी कोणतीच सामाजिक भूमिका बजावली नसेल? सामाजिक भूमिकादेखील बजावली आहे आणि वैचारिक देवाणघेवाणदेखील झाली आहे. सत्य इतकंच आहे की हे पुढे येऊ दिलं गेलं नाही. दडवून ठेवण्यात आलं. सुधारणावादी चळवळींचा इतिहास पाहता आपल्या देशात ज्या काही सुधारणावादी चालवली जन्माला आल्या त्या भारतात इस्लामच्या प्रवेशानंतरच जन्माला आल्या हे वास्तव कोणत्याही इतिहास अभ्यासकाला नाकारता येणारच नाही. हे का झालं? कारण मुस्लिमांनी इस्लामी विचारांची देवाणघेवाण केली. राजाराम मोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले, न्या. रानडे, स्वामी विवेकानंदसारख्या विचारवंतांनी हे उघडपणे मान्य केलं आहे की शोषित समाजात चेतना निर्माण करण्याचे काम इस्लामने केले. एम. एन. रॉयसारख्या प्रकांड विद्वान भारतीय सुधारणावादी आंदोलनांचा जनक म्हणून इस्लामचा गौरव करतो.

संत तुकाराम महाराज आणि हजरत शेख महंमद:
अहमदनगर येथील श्रीगोंदा या ठिकाणी हजरत शेख महंमद हे एक मुस्लिम विचारवंत होते. त्यांची आणि संत तुकाराम महाराजांची घनिष्ट मैत्री. हजरत शेख महंमद साहेब कुरआन प्रवचन घ्यायचे. त्याला तुकाराम महाराजांची आवर्जून उपस्थिती असायची. कुरआनाच्या कित्येक आयती तुकारामांच्या गाथेत अभंग स्वरूपात सापडतात. त्यांची ही मैत्री त्यांच्या मृत्यूनंतरदेखील टिकून आहे. देहू गावातून निघणारी दिंडी आजही श्रीगोंदा येथे शेख महंमद यांच्या दफनस्थळी तीन दिवस मुक्कामाला असते. इतका मान हजरत शेख महंमद यांचा. बरे चालता चालता हेदेखील स्पष्ट करतो की हजरत हा फारशी शब्द असून आदरणीय, माननीय या अर्थी वापरला जातो. ‘हजरत’ असा उल्लेख करणे म्हणजे मुस्लिमच असणे असे नाही.

संत तुकाराम महाराज आणि अल्लाह:
संत तुकाराम महाराज आस्तिक होते आणि सृष्टीच्या निर्मात्यावर त्यांची श्रद्धा होती. आ. ह. साळुंखे सारखे विद्वान जेव्हा तुकाराम महाराजांची नास्तिक अशी मांडणी करतात तर ती निर्मात्याचा नकार देणारा या अर्थाने नसून ‘वेदांना न मानणारा’ या अर्थाने असते. तुकाराम महाराज आपल्या अभंगात अल्लाहचा उल्लेख अनेक ठिकाणी करतात. अल्लाहचे सार्वभौमत्व स्पष्टपणे मान्य करतात. एका ठिकाणी ते म्हणतात,
।। अल्लाह देवे अल्लाह दिलावे । अल्लाह दारू (दाता) अल्लाह खिलावे
अल्लाह बिगर नाही कोय । अल्लाह करे सो ही होय ।।

तर दुसऱ्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात,
।। अल्लाह करे सो होय बाबा करतार का सिरताज
जिकर करो अल्लाह का बाबा सावल्या अंदर भेस
कहे तुका जो नर बुझे सोही भया दरवेस ।।

असे एक नाही अनेक अभंग तुकारामांच्या गाथेत आढळतात. यावरून असे दिसते की विश्वाचा परमेश्वर तोच हरी तोच अल्लाह ही संकल्पना शेख फरीद यांच्या संपर्कातून तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचली होती. सामन्यात जसा गैरसमज आहे की अल्लाह मुस्लिमांचा देव आहे, हे तुकारामांना मान्य नव्हते. इस्लाम सर्वांच्या परमेश्वराचा अल्लाह या नावाने उल्लेख करतो ही संकल्पना त्यांना माहित होती. तसेच ते जर ‘निर्माता’ न मानणारे नास्तिक असते तर त्यांचे हे विचार दांभिकता ठरतात. एका संताने असा दांभिकतेचा मार्ग पत्करावा हे बुद्धीला कधीही पटणारे नाही. म्हणून सत्य हेच आहे की ते आस्तिक होते.

तुकाराम महाराज आणि समाज सुधारणा:
तुकाराम महाराज मुस्लिम संतांच्या संपर्कात असल्याने ते समाजसुधारणांचा अध्यात्मिक मार्ग स्वीकारताना दिसतात. त्यांच्या अभंगावर सामाजिक विकृतीपेक्षा जास्त भर वयक्तिक विकृतीवर देण्यात आला आहे. व्यक्तीच्या चारित्र्याचा उद्धार केल्याशिवाय समाजाची सुधारणा होणार नाही हे त्यांच्या अभंगातून जाणवते. समाज सुधारणा करायची असेल तर स्वतःच्या चरित्रापासून सुरुवात करायला हवी हे तुकाराम महाराजांच्या अभंगात पावलोपावली जाणवते. आजच्या काही ढोंगी सुधारकांचा ‘आमचे नीच चरित्र पाहू नका, आमचे उच्च विचार पहा’ अश्या प्रकारची संत तुकारामांची सुधारणा नाही. आपल्या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,

।। का रे ना आठविसी कृपाळू देवासी । पोसितो जगाशी, एकला तो ।।
।। बाळा दुधा कोण करिते उत्पत्ती । वाढवे श्रीपती सवे दोन्ही ।।
।। फुटती तरुवर उष्णकाळ मासी । जीवन तयासी कोण धारी ।।
।। तेणे तुझी काय नाही केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनी ।।
।। तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करी ।।

प्रेषितांचे उपदेश आणि तुकारामांचे अभंग:
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अनेक अभंगातून प्रेषितांच्या हदीसींना व्यक्त केले आहे. प्रेषित मुहम्म्मद (शांती असो त्यांच्यावर) यांनी अनेक ठिकाणी मानवतेला उपदेश करताना सांगितले की आपल्या घरांना स्मशान बनवू नका. ईशभय मणी बाळगा. (संदर्भ: बुखारी, मुस्लिम) तोच संदेश तुकाराम महाराज आपल्या अभंगातून खालील शब्दांत देतात,
।। हरी नाही चित्ती तो शव जाणा । स्मशान ती भूमी प्रेत रूप जण ।।

तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागेल. तुम्ही इतरांच्या मार्गात काटे लावून स्वतःसाठी फुलांची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. हा संदेश देताना तुकाराम महाराज म्हणतात,
।। पेरी कडू जिरे, मागी अमृत फळे । अरके वृक्षा कैसी येती ।।

पैगंबर, प्रेषित, संत कशासाठी?
पैगंबर, संतांची भूमिका काय होती? ते जगाची सत्ता मागू इच्छित होते? की त्यांना लोकांना गुलाम करायचे होते? कुरआन प्रेषित मुहम्मद यांचा उल्लेख करताना त्यांची तळमळ पाहून म्हणतो, हे प्रेषित काय या लोकांच्या कल्याणापोटी स्वतःचे प्राण पणाला लावणार काय?

तर दुसऱ्या ठिकाणी कुरआन म्हणतो लोकांचे दुःख पाहून तुमचा जीव कासावीस होतो याची आम्हाला जाणीव आहे. याच संदेशाला तुकाराम महाराज आपल्या अभंगात अश्याप्रकारे व्यक्त करतात,
।। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परोपकारें ।।

प्रेषित मुहम्मद म्हणतात निवाड्याच्या दिवशी माणसाला त्याच्या कर्माचे फळ दिले जाईल. तेच अल्लाह विचारेल, हे मानव तू माझी मदत का नाही केलीस? मानव उत्तर देईल हे परमेश्वरा, तू जगाचा पोशिंदा, मी तुझी मदत कसा बरे करू? अल्लाह उत्तर देईल गरजवंतांची मदत केली असतीस तर मी तुला तेथे भेटलो असतो. (अर्थातच ही केवळ उपमा आहे) याचा उल्लेख संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात अशाप्रकारे करतात,
।। जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले ।।
।। तो चि साधु ओळखावा | देव तेथे चि जाणावा ||२||

प्रेषित मुहम्मद म्हणतात मृत्यूची जाणीव ठेऊन मानवाने सत्कर्म करीत जावे. मृत्यूला सदा स्मरावें. संत तुकाराम महाराज म्हणतात,
।। नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।

अल्लाह आणि नबी वर संत तुकारामांचा विश्वास:
अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांचा उल्लेख करताना संत तुकाराम महाराज निर्भीडपणे म्हणतात, माझे डोके, हात, पाय जरी कापून टाकले तरी माझा जीव मुळीच घाबरणार नाही. अल्लाह तूच एकटा आहेस, नबी तूच एकटा आहेस.
।। अल्लाह एक तु । नबी एक तु ।।
।। काटते सर पावो हाते । नही जीव डराये ।।

(सर्व संदर्भ देहू संस्थानतर्फे प्रकाशित अधिकृत सार्थ श्री तुकाराम गाथेतील आहेत. पृ. क्र. ८९२-८९४. आजही देहू गावात गाथा मंदिरामध्ये अल्लाह आणि नबी असे अभंग संगमरवरीवर कोरलेले आढळतात.)

© Mujahid Shaikh

Leave a comment